सांगली प्रतिनिधी
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक 18 मधील एकता कॉलनी आणि परिसरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने इथले नागरिक त्रस्त झाले असून, ते आता आक्रमक झाले आहेत. शिवाय इथल्या वार्डमधील नगरसेवकांचाही याकडे कानाडोळा होत असल्याने नागरिकांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. इथल्या सर्व नागरिकांनी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्याशी संपर्क साधून या समस्येविषयी आवाज उठवला आहे. शिवाय सर्वच नागरी सुविधांचा या परिसरात बोजवारा उडाला असून गटारी वेळच्यावेळी साफ केल्या जात नाहीत, कचरा घंटा गाडी ही तीन-चार दिवसातून एकदाच या परिसरात फिरकते त्यामुळे लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
दरम्यान . येत्या दोन दिवसांमध्ये महानगरपालिका प्रशासनाने इथल्या पाण्याची समस्या दूर करावी अन्यथा महानगरपालिकेच्या आयुक्तांना घेराव घालण्याचा इशारा लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे आणि इथल्या स्थानिक नागरिक बंधू भगिनींनी दिला आहे.
लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी सांगली महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधा असता त्यांनी येत्या दोन-तीन दिवसांमध्ये हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी समता महिला मंडळाच्या अध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्या मदनावती ताई पाटील, मयुरी जाधव, सलीम सनदी, श्रीकांत नारायणे, बालेसो शेख, रमिजा मुजावर , हाफिजा मकानदार, फातिमा पकाली, हौसाबाई लोहार, सुनिता सरवाड, प्रणाली कदम, भारताबाई खडते, शफिया मुजावर , सुगरा मुजावर, रुक्मिणी इंगवले, कस्तुरी सारवड , पुष्पा आळगेकर, मुनिरा खलिफा, आदींसह इतर स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.