महात्मा फुले जयंतीनिमित्त समाजाला विकासाची भेट – आ. किशोर जोरगेवार, आमदार जोरगेवार यांच्या हस्ते क्षत्रिय माळी समाज भवनाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 10/04/2025 4:54 PM



महात्मा फुले हे केवळ नाव नाही, तर सामाजिक परिवर्तनाची एक अखंड ज्वाळा आहेत. त्यांनी शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय या तत्त्वांना समाजाच्या केंद्रस्थानी आणले. आज ४० लाख रुपये आमदार निधीतून क्षत्रिय माळी समाज भवनाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन होत आहे. ही जागा समाजाच्या भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शन करणारी ठरेल, नव्या विचारांचे केंद्र बनेल, आणि सामाजिक ऐक्य वाढवणारी भूमी ठरेल. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ही समाजाला विकासाची भेट असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांनी उपलब्ध करून दिलेल्या ४० लाख रुपयांच्या स्थानिक आमदार निधीतून क्षत्रिय माळी समाज भवनाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. आज गुरुवारी  या कामाचे भूमिपूजन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक नंदू नागरकर, क्षत्रिय माळी सेवा मंडळाचे अध्यक्ष राजू बनकर, भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, अमोल शेंडे, क्षत्रिय माळी सेवा मंडळाचे उपाध्यक्ष धनंजय वासेकर, सागर वासेकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूर मतदारसंघाच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. शहराचा शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या विकास करण्यावर आमचा भर आहे. हे विकासकार्य सुरू असताना प्रत्येक समाजाला सक्षम करण्याचे कामही आमच्या वतीने केले जात आहे. समाज बांधवांकडे स्वतःच्या हक्काचे भवन असावे यासाठी शहरी भागासह ग्रामीण भागातही समाज भवन निर्मितीवर भर दिला आहे. आता क्षत्रिय माळी समाज भवनाचे नूतनीकरण करण्यासाठी निधी देता आला याचा आनंद आहे.
महात्मा फुले हे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. शोषित, वंचित आणि मागासलेल्या घटकांसाठी त्यांनी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. आमदार निधी अंतर्गत ४० लाख रुपयांची तरतूद करून क्षत्रिय माळी समाज भवनाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. समाजासाठी ही जागा एक महत्त्वाची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख आहे. येथून अनेक उपक्रम, एकत्र येणं, आणि भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शन होणार आहे. या माध्यमातून प्रत्येक समाजघटकाला न्याय मिळावा, संधी मिळावी, आणि त्या संधींच्या माध्यमातून विकासाची वाट मोकळी व्हावी. असेही आमदार जोरगेवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी माळी समाज युवा मंचाचे अध्यक्ष सागर वानखेडे, सचिन निंबाळकर, अभिजीत मारोतकर, कार्तिक वानखेडे, भालचंद्र दानव, शैलेश इंगोले, आशुतोष वानखेडे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या