ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा विकास राष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून करावा : आम. सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या सभेत ठराव पारित
केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना देशातील ५० पर्यटन स्थळांचा विकास करण्याचा मनोदय जाहीर केला आहे. चंद्रपूर जिल्हयातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अर्थात ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राचा पर्यटन विषयक मानबिंदू आहे. हे जागतीक दर्जाचे पर्यटन स्थळ आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये सर्वाधिक वाघ असून विविध प्राणी देखील या व्याघ्र प्रकल्पात आहेत. कोअर झोन तसेच बफर झोन मध्ये मोठ्या संख्येने पर्यटक सातत्याने येत असतात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ५० पर्यटन स्थळामध्ये या प्रकल्पाचा समावेश व्हावा अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीने पारित करावा व हा ठराव केंद्र व राज्य शासनाकडे पाठवावा असेही ते म्हणाले.
सोमनाथ तीर्थक्षेत्राला ब वर्ग दर्जा देण्यात यावा
मूल तालुक्यातील सोमनाथ हे प्रसिद्ध पर्यटन व तीर्थस्थळ असून या ठिकाणी मोठया संख्येने भाविक व पर्यटक सातत्याने येत असतात. या ठिकाणी श्री शंकराचे जागृत देवस्थान आहे. हा परिसर निसर्गरम्य असून मोठा धबधबा या ठिकाणी आहे. या ठिकाणी भाविक व पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या या दृष्टीने या स्थळाला ब वर्ग दर्जा देण्याचा ठराव पारित करण्याची मागणी आ मुनगंटीवार यांनी यावेळी केली.
श्री क्षेत्र धाबा ता. गोंडपिपरी या तिर्थस्थळाला ब वर्ग दर्जा देण्यात यावा
चंद्रपूर जिल्हयातील गोंडपिपरी तालुक्यातील श्री क्षेत्र धाबा येथे संतश्री परमहंस कौंडय्या महाराज यांचे समाधीस्थळ आहे. मोठया प्रमाणावर भाविक याठिकाणी सातत्याने येत असतात. भाविकांसाठी सोईसुविधा अपु-या आहेत. दरवर्षी जानेवारी महिन्यात याठिकाणी मोठी यात्रा भरते. या तिर्थस्थळाचा समावेश ब वर्गात करण्याची आवश्यकता आहे. सदर तिर्थस्थळाला ब वर्ग दर्जा मिळण्याबाबतचा ठराव पारित करण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. हे तिन्ही ठराव जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मंजूर करण्यात आले असून पुढील कार्यवाहीसाठी केंद्र व राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे.