पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करणं ही प्रत्येक भारतीय नागरीकाची गरज आणि इच्छा आहे. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने समाजाच्या प्रत्येक स्तरासाठी विकास योजना राबवल्या. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी जनता उत्सुक आहे. त्यामुळे कोल्हापुरातून महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना खासदार करूया, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. राधानगरी, भुदरगड, आजरा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांच्या कूर इथं झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला मोठी गर्दी केली होती. या मेळाव्यात बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी देशात पुन्हा भाजपचे सरकार येणे का आवश्यक आहे हे सविस्तर स्पष्ट केले. कॉंग्रेस सरकारच्या काळात केवळ गरिबी हटावचा नारा दिला. पण गरिबी हटली नाही. याउलट मोदी सरकारच्या काळात समाजातील प्रत्येक घटकाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले शेतकरी असो किंवा महिलावर्ग तरुण असोत किंवा कष्टकरी मजूर, प्रत्येक वर्गासाठी योजना आखून त्याची यशस्वी अंमलबजावणी झाली. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि गोरगरिबांसाठी अनेक योजना त्यांनी सुरू केल्या. उज्वला गॅस, पीएम किसान योजना, मोफत रेशन यासह अनेक योजना राबवल्या. प्रत्येक महिन्याला पंतप्रधान देशवासीयांशी संवाद साधू लागले असे उर्जादायी, सकारात्मक आणि सक्रिय पंतप्रधान यापूर्वी नागरिकांनी कधीच पाहिले नव्हते. देशातील जनता मोदींवर प्रेम करू लागलीय. अभिमान वाटावा, अशी कामं देशात झाली आहेत. विकसित भारताचं स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी साकार करून दाखवलंय. जिल्ह्यातील सर्व नेते एकत्र आल्यानं कॉंग्रेसला एकाही ठिकाणी बूथ लावण्यासाठी माणसं मिळणार नाहीत, अशी केविलवाणी स्थिती झाली आहे, असंही खासदार महाडिक यांनी नमूद केलं. उमेदवार संजय मंडलिक हेच मोदी आहेत, असं समजून भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनं देशात अनेक योजना राबवल्या. कॉंग्रेसचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी जनतेत संभ्रमावस्था निर्माण करत आहेत, असं भाजप जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी नमूद केलं. जिल्ह्यातील एका कॉग्रेसच्या नेत्यानं कोल्हापूरवर टोल लादून आणि टोलची पावती फाडून कोल्हापूरच्या जनतेचा अवमान केला होता. तेच नेते आता जनतेची दिशाभूल करत आहेत, त्या कॉग्रेस नेत्याला त्यांची जागा दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी संजय मंडलिक यांना विजयी करावं, असं आवाहन भाजप जिल्हा उपाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केलं. तालुकाध्यक्ष अनिल तळकर, सरपंच प्रकाश वास्कर, देवराज बारदेस्कर यांनीही मनोगतं व्यक्त केली. मेळाव्याला भाजप तालुकाध्यक्ष बाळ केसरकर, विलास रणदिवे, शिवराज देसाई, दीपक शिरगावकर, विलास बेलेकर, धोंडीराम मगदूम, किरण कुरडे, नारायण पाटील, अलकेश कांदळकर, प्रताप मेंगाणे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.