नांदेड :- जिल्ह्यात बाल विवाहाची कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ शहरी भागातील बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच ग्रामीण भागात ग्रामसेवक, अंगणवाडी सेवीका, चाईल्ड हेल्प लाईन 1098 या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधावा. जेणे करुन भविष्यातील अनिष्ठ प्रथा रोखता येतील असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
जिल्ह्यात बालविवाह मुक्त भारत 100 दिवस अभियान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शानाखाली सुरु आहे. अर्धापुर तालुक्यात एका 17 वर्षीय बालिकेचा बालविवाह होणार असल्याबाबत गोपनीय माहिती चाईल्ड लाईन 1098 ला प्राप्त झाली. ही तक्रार प्राप्त होताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बालसंरक्षण अधिकारी विद्या आळणे व चाईल्ड हेल्प लाईनचे कर्मचारी ऐश्वर्या शेवाळे, दिपाली हिंगोले यांनी पिडीत मुलीच्या घरी गृहभेट देऊन बालिकेचा आई व नातेवाईकांचे समुपदेशन केले. मुलीच्या वयाबाबत खात्री करुन बालविवाह दुष्परीणाम व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 बाबत सविस्तर माहिती दिली. बालविवाह बेकायदेशीर असल्याचे मुलीच्या पालकाला समजावुन सांगण्यात आले. सदर मुलीला काळजी व संरक्षणाच्यादृष्टीने बालकल्याण समिती नांदेड यांच्या समोर हजर करण्यात आले. यावेळी पालकांकडून बालविवाह न करण्याबाबत हमीपत्र घेण्यात आले असुन सदरील बालविवाह रोखण्यात आला आहे.