शहाजी राजेभोसले यांच्या जनहिताच्या मागण्यांसाठी ग्रामस्थ एकवटले; उपोषणाचा चौथा दिवस
जामखेड | अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील नान्नज येथे जनहिताच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शहाजी राजेभोसले यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा सोमवारी चौथा दिवस पूर्ण झाला. मागण्या अद्याप पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून, आज (१० ऑगस्ट) रात्री ८ वाजता महिलांचा कँडल मोर्चा आणि उद्या (११ ऑगस्ट) सकाळी ९ वाजता जामखेड-करमाळा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
उपोषणस्थळी महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन उपोषणकर्ते शहाजी राजेभोसले यांच्याशी चर्चा केली. जामखेड तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार पाडळे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुतार यांनी लेखी पत्र देत प्रशासनाच्या भूमिकेची माहिती दिली. मात्र, केवळ आश्वासनांवर समाधान नसून प्रत्यक्षात मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, अशी भूमिका शहाजी राजेभोसले यांनी स्पष्ट केली.
ग्रामस्थांनीही या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला आहे. गावातील व्यापारी, महिला, युवक आणि विविध सामाजिक संघटनांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून आंदोलनाला समर्थन दिले. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे नान्नजमध्ये आंदोलनाचे वातावरण अधिक तीव्र झाले असून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.
महिलांचा कँडल मोर्चा
राजेभोसले यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज रात्री ८ वाजता विठ्ठल मंदिरापासून उपोषणस्थळापर्यंत महिलांचा कँडल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
उद्या रास्ता रोको आंदोलन
मागण्या मान्य न झाल्यास उद्या सकाळी ९ वाजता नान्नज येथील जामखेड-करमाळा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. व्यापारी व नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
राजेभोसले यांच्या प्रमुख मागण्या
- नान्नज येथे महिलांसाठी सुसज्ज सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणे.
- आधुनिक व सुसज्ज बसस्थानकाची उभारणी.
- विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करणे.
- गाव परिसरात आवश्यक ठिकाणी बंधारे उभारणे.
- प्रलंबित रस्त्यांचे डांबरीकरण करून वाहतूक सुविधा सुधारणा.
उपोषणकर्ते शहाजी राजेभोसले यांनी मांडलेल्या या मागण्या गावाच्या विकासाशी आणि जनहिताशी संबंधित असल्याने शासनाने त्यांच्या प्रकृतीचा विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
प्रशासनाची भेट
सोमवारी उपोषणस्थळी नायब तहसीलदार पाडळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुतार, जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील तसेच पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पाटील यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान, संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नान्नजमध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी दिली आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन प्रश्न निकाली काढावेत. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
#नान्नज
#जामखेड
#शहाजीराजेभोसले
#रास्तारोकोआंदोलन
#अहिल्यानगर