जामखेड | प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील आघी ग्रामपंचायतीतील विविध विकासकामांबाबत अनियमिततेचा संशय व्यक्त करत ग्रामस्थांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे रीतसर लेखी अर्ज सादर केला असून, संपूर्ण प्रकाराची माहिती देऊनही अद्याप चौकशी सुरू करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात एलईडी लाईट, पाणी पुरवठा, समाजमंदिर, टीव्ही, आर.ओ. फिल्टर, इलेक्ट्रिक वायरिंग, पंखे, कचरा कुंडी, माहिती फलक (बोर्ड), सीसीटीव्ही कॅमेरे तसेच दलित वस्तीतील पाण्याची टाकी आदी विकासकामांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची मागणी केली आहे.
तसेच २७ जून २०२२ रोजीच्या काँक्रीटीकरण कामासाठी ₹४,४८,५६०, अन्य एका कामासाठी ₹६१,२००, शाळेच्या इलेक्ट्रिफिकेशनसाठी ₹२०,२५० तसेच कोनशिलेसाठी ₹११,००० इतक्या खर्चाच्या नोंदींची चौकशी करून निधीचा वापर नियमानुसार झाला का, याची खातरजमा करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या निवेदनावर बाळासाहेब बोराटे, विकास शिंदे, अनिकेत शिंदे, प्रमोद तेरकर, उमेश इंगळे, किसन तेरकर, हनुमंत वारे, कल्याण शिंदे, जब्बार शेख, निखिल तेरकर, आप्पासाहेब वारे, हनुमंत तेरकर, रशीद शेख, अशोक भगत, राजेंद्र गावडे, नवनाथ तेरकर, भाऊसाहेब मारकड, राऊसाहेब मारकड, जालिंदर घुले आणि कल्याण इंगळे या ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ग्रामस्थांनी संबंधित विकासकामांची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
टीप : या बातमीतील सर्व बाबी ग्रामस्थांनी सादर केलेल्या निवेदन व आरोपांवर आधारित आहेत. संबंधित प्रकरणाची अधिकृत चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे चौकशी पूर्ण होऊन अधिकृत निष्कर्ष येईपर्यंत कोणावरही दोष निश्चित झालेला मानता येणार नाही. :::
#Jamkhed #Ahilyanagar #GramPanchayat #Aaghi #DevelopmentWorks #Inquiry #LocalNews #Maharashtra #RuralDevelopment