नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सामाजिक समता सप्ताहाचे उत्साहात उद्घाटन संपन्न झाले. फुले-आंबेडकर विचार केवळ अभ्यासापुरते न ठेवता दैनंदिन जीवनात आचरणात आणणे गरजेचे आहे, असे आवाहन कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले.
महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले की, फुले-आंबेडकरांचे विचार समाजातील बांधिलकीची जाणीव करून देतात व संकटांचा सामना करण्याची प्रेरणा देतात. मात्र, या विचारांचा प्रभावी परिणाम होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या वृत्ती व दृष्टिकोनात बदल घडवणे आवश्यक आहे. दृष्टिकोन बदलल्यास ध्येयही अधिक उंचावते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, प्रमुख वक्ते व चळवळीचे अभ्यासक डॉ. नारायण कांबळे, डॉ. रवी सरोदे, डॉ. राजपालसिंह चिखलीकर, डॉ. मारोती गायकवाड, डॉ. राजेंद्र गोणारकर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या समन्वयक डॉ. सुनीता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख वक्ते डॉ. नारायण कांबळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ एका समाजाच्या नेत्याच्या चौकटीत पाहिले जाणे ही खेदजनक बाब आहे. त्यांनी राष्ट्र उभारणीत दिलेले योगदान व्यापक असून ते समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि इतिहासकार होते. तरीदेखील त्यांच्या विचारांचा विद्यापीठीय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी आजही संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजात समतेच्या मूल्यांची चर्चा होत असली तरी जातीयतेचे वास्तव पूर्णपणे नाहीसे झालेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनीता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शिल्पा उदगीरकर यांनी तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ शेळके यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. हर्षवर्धन दवणे, स्वप्निल नरबाग, मनोहर सोनकांबळे, संदीप एडके, काळबा हनवते, सिद्धार्थ वाघमारे, श्रद्धा हेरकर, प्रज्ञा अटकोरे, राज पवार आदींनी परिश्रम घेतले.