सांगली प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नागरिकांच्या डोळ्यात धुवून घेतली जात असून, सुस्थितीतील रस्त्यावरच पुन्हा कार्पेट टाकून डांबरीकरण केले जात असल्याने व यासाठी तब्बल साडेसहा कोटी रुपये निधी खर्च केला जात असल्याने या कामाची लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी आज पाहणी केली. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रारही करण्यात आलीय.
विश्रामबाग ते भारती हॉस्पिटल हे अंतर तीन ते सव्वा तीन किलो मीटर असून हा रस्ता अगदी सुस्थितीत आहे. मात्र या रस्त्यावरच पुन्हा एकदा डांबरीकरण करण्यात येत असून, हे डांबरीकरण रस्ता न उकरताच त्यावर फक्त कार्पेट टाकून करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत डोळेझाक केली जात असल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यामध्ये लक्ष घालून सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब विचारावा. अशी मागणी ही मनोज भिसे यांनी केली आहे
या रस्त्यासाठी तब्बल साडेसहा कोटी रुपये खर्च येणार असून सुस्थितीत असणाऱ्या रस्त्यावर एवढा मोठा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून का खर्च केला जातोय? का फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदारांना पोसण्यासाठी आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या टक्केवारीसाठीच हा प्रताप केला जातोय का? असा प्रश्नही मनोज भिसे यांनी व्यक्त केला आहे.