विशेष मतदार नोंदणी शिबिरात 'BLO' गैरहजर; अनेक नागरिक नोंदणीपासून वंचित!
पुढील शिबिरास बीएलओ उपस्थित न राहिल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार: शिवसेना शहरप्रमुख काकासाहेब देशमुख यांचा इशारा
भगूर (विशेष प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरात 'बीएलओ' (BLO - भागस्तरीय अधिकारी) अनुपस्थित राहिल्यामुळे भगूर शहरातील अनेक नागरिक आणि नवमतदार नोंदणीपासून वंचित राहिल्याचा प्रकार समोर आला आहे. शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही अधिकारी शिबिराकडे फिरकलेच नसल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर, येत्या २६ व २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पुढील शिबिरास सर्व बीएलओ यांनी अनिवार्यपणे उपस्थित राहावे, अन्यथा मुख्य निवडणूक आयोगाकडे थेट तक्रार दाखल केली जाईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख काकासाहेब देशमुख आणि विविध पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
नेमका प्रकार काय?
मुख्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांची नावे नोंदवणे, मतदार यादीतील चुका दुरुस्त करणे आणि 'SIR' (नावे न जुळणारे/लिंक नसलेले मतदार) संदर्भातील त्रुटी दूर करण्यासाठी शनिवार दि. १९ व रविवार दि. २० सप्टेंबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत शासनाने अधिकृत जीआर (शासकीय निर्णय) जारी करून हे शिबिर संबंधित मतदान केंद्रांवर आयोजित करण्याचे निर्देश दिले होते.
यानुसार भगूर नगरपालिकेच्या वतीने जुन्या इमारतीत सर्व बीएलओ यांच्या उपस्थितीत एकत्र शिबिर आयोजित करण्यात आले होते. मात्र, शिबिराच्या दोन्ही दिवशी अनेक बीएलओ अनुपस्थित राहिले. मतदार यादीत नावे नोंदवण्यासाठी आणि त्रुटी दुरुस्तीसाठी नागरिक कागदपत्रे घेऊन केंद्रावर पोहोचले; मात्र अधिकारीच नसल्याने त्यांना ताटकळत राहावे लागले आणि अखेर न काम होताच रिकाम्या हाताने परत फिरावे लागले. यामुळे अनेक नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
२६ व २७ सप्टेंबरच्या शिबिरासाठी इशारा
या भोंगळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करत लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. "शासनाने विशेष मोहीम राबवूनही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा हिरमोड झाला आहे. येत्या २६ आणि २७ सप्टेंबर रोजी पुन्हा विशेष शिबिर होणार असून, या शिबिरास सर्व बीएलओ हजर राहिलेच पाहिजेत. अन्यथा निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार करून कारवाईची मागणी केली जाईल," असा इशारा देण्यात आला आहे.
या मागणीचे निवेदन व भूमिका मांडताना शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख काकासाहेब देशमुख, नगरसेवक अमोल इंदारखे, सागर चंद्रमोरे, बबलू पवार, नगरसेविका कांता गायकवाड, जयश्री देशमुख , अनिल कासार, निलेश हासे, संतोष सोनवणे, सुधाकर ताजनपुरे, अशोक कनोजिया, मनसे तालुकाप्रमुख नितीन काळे, श्याम देशमुख, नावेद शेख, अमोल गणोरे व भूषण करंजकर आदी उपस्थित होते.