नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६” अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांच्या याद्या लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
या अनुषंगाने जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, संबंधित याद्या गाव चावडी, ग्रामपंचायत, बँकांच्या शाखा, आपले सरकार सेवा केंद्र तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्था येथे उपलब्ध करून देण्यात येतील. याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांनी त्यामध्ये आपले नाव समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच कर्जखाते क्रमांक व कर्जाची रक्कम यासह सर्व तपशील अचूक असल्याची पडताळणी करावी.
यादीतील विशिष्ट क्रमांक घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जावे. तेथे केंद्र चालकास हा क्रमांक देऊन आधार प्रमाणीकरण (बायोमेट्रिक) करून घ्यावे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅक (AgriStack) नोंदणी पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी.
लाभार्थी यादीतील आधार क्रमांक, कर्जखाते क्रमांक व कर्जाची रक्कम याबाबत सहमती दर्शविल्यानंतर बायोमेट्रिक पद्धतीने प्रमाणीकरण करावे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मंजूर लाभाची रक्कम संबंधित बँकेच्या कर्ज खात्यात जमा करण्यात येईल.
जिल्ह्यातील पात्र व लाभार्थी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांनी केले आहे.