नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून जनतेची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लागत असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण होत आहे, असे प्रतिपादन आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांनी केले.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक एक अंतर्गत नांदेड तालुक्यातील वाजेगाव महसूल मंडळात आयोजित शिबिराचे उद्घाटन आमदार बोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार संजय वारकड, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण मुंडे, नायब तहसीलदार सुनील माचेवाड, पुरवठा निरीक्षण अधिकारी रवींद्र राठोड, प्राचार्य तुकाराम गाडेकर, डॉ.पाईकराव, डॉ. अमजद, बाळू पाटील ब्राम्हणवाडेकर, पिंटु पाटील शिंदे , सरपंच जमील सेठ, दत्ता जाधव, हनुमंतराव पुयड, उत्तमराव पुयड, मंडळ कृषी अधिकारी सुनील सानप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या शिबिराच्या माध्यमातून ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेनुसार विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे. तसेच वंचित लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचे कार्य प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे आमदार बोंढारकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार नांदेड संजय वारकड यांनी केले. त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात 485 सातबारा, 8अ चे 485 दाखले, उत्पन्न, रहिवासी, वय व रहिवासी, जातीचे, अल्पभूधारक आदि 460 प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच संजय गांधी योजनेच्या 8 लाभार्थांना लाभ मंजुरीचे प्रमाणपत्र तसेच 45 लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आली. या कार्यक्रमात विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते त्यात प्रामुख्याने महसूल विभाग, निवडणूक विभाग, विशेष सहाय्य विभाग, आपले सरकार सेतू केंद्र, ग्रामविकास विभाग, भूमी अभिलेख, नोंदणी व मुद्रांक विभाग, कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभाग, महावितरण, बचत गट, आरोग्य विभाग, तसेच अनुलोम स्वयंसेवी संस्था आदींचा सहभाग होता. या कार्यक्रमास वाजेगाव महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी प्रमोद बडवणे, ग्राम महसूल अधिकारी एम के पाटील, ललिता नागलमे, तसेच सुनिता परोडवाड, प्रतिका मुडगुलवार, संतोष वाघमारे, तसेच मंडळ अधिकारी कुणाल जगताप ,संतोष आस्कूलकर ,ग्राम महसूल अधिकारी मारुती कदम, मनोज जाधव, माधव भिसे, मनोज सरपे, आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.