यंदाच्या परीक्षेत गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 30/12/2025 7:38 PM

नांदेड :-मागील वर्षी 2025 झालेल्या परीक्षांतील अनुभव लक्षात घेता, फेब्रुवारी/मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांदरम्यान कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित कोणाचीही गय केली जाणार नाही. आवश्यक असल्यास संबंधित परीक्षा केंद्राची मान्यताही रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी दिले.

फेब्रुवारी/मार्च 2026 च्या परीक्षांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांची संयुक्त पूर्वतयारी आढावा बैठक आज मातोश्री प्रतिष्ठाण इंजिनिअरिंग कॉलेज, खुपसरवाडी ता. जि. नांदेड येथे पार पडली. ही बैठक विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकररावजी तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

यावेळी विभागीय मंडळाच्या प्रभारी सचिव श्रीमती अनुपमा भंडारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर, शिक्षणाधिकारी (योजना) दिलीपकुमार बनसोडे, संस्थेचे अध्यक्ष कामाजी पवार व सचिव श्री. चारी  उपस्थित होते.

बैठकीत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी 2025 च्या परीक्षेदरम्यान काही केंद्रांवरील अव्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “परीक्षार्थ्यांना बसण्यासाठी ड्युअल डेस्क नाहीत, कंपाऊंड वॉल नाही, बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे ही दहावी-बारावीची परीक्षा आहे की जत्रा, असा भास होतो,” अशा शब्दांत त्यांनी परिस्थितीवर भाष्य केले.

2026 च्या परीक्षेपूर्वी सर्व परीक्षा केंद्रांनी भौतिक सुविधांची पूर्णता करावी. सर्व परीक्षार्थ्यांना ड्युअल डेस्कची व्यवस्था असावी. सीसीटीव्ही, पिण्याचे पाणी, वीज व्यवस्था, पंखे, लाईट, रॅम्प, कंपाऊंड वॉल आदी सुविधा अनिवार्यपणे उपलब्ध असाव्यात. या सुविधा आढळून न आल्यास संबंधित केंद्र बंद करण्याची शिफारस करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

परीक्षेदरम्यान एखाद्या केंद्रावर गैरप्रकार झाला किंवा त्यास प्रोत्साहन मिळाल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. कॉपी करून उत्तीर्ण होणे ही अत्यंत खेदजनक बाब असून, गैरप्रकारातून उत्तीर्ण झालेला विद्यार्थी भविष्यात चांगला नागरिक होत नाही, याची जाणीव सर्वांनी ठेवावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

आजच्या शिक्षण पद्धतीत अंतर्गत मूल्यांकनाचे 20 गुण असून लेखी परीक्षेत 80 पैकी केवळ 15 गुण आवश्यक आहेत. वर्षभरात विद्यार्थ्यांना ही तयारी करून परीक्षा देता येत नसेल, तर त्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे 2026 च्या परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशाराच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला.

यावेळी विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकररावजी तेलंग यांनी मंडळाच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. अपार आयडी, खाजगी विद्यार्थ्यांचे अर्ज, अतिविलंब शुल्काच्या तारखा तसेच कॉपीमुक्त अभियानाची पूर्वतयारी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. गैरप्रकाराला प्रोत्साहन दिल्यास कोणाचाही फायदा होत नाही, उलट नुकसानच होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

शिक्षणाधिकारी माधव सलगर व दिलीपकुमार बनसोडे यांनीही कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष कामाजी पवार यांनी प्रस्ताविकातून संस्थेच्या कामकाजाची व विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली.

या सहविचार सभेस जिल्ह्यातील 11 तालुक्यांतून सुमारे 635 मुख्याध्यापक व प्राचार्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विभागीय मंडळ, लातूर येथील सहायक अधीक्षक श्री. वैद्य यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी सहायक शिक्षण उपनिरीक्षक हनुमंत पोकले यांनी परिश्रम घेतले, तर संस्थेचे प्रतिनिधी श्री. किनेकर यांनी पूर्वनियोजन केले.

यापूर्वी 27 डिसेंबर 2025 रोजी शिवनेरी पोदार लर्न स्कूल, बिजूर (ता. बिलोली) येथे पाच तालुक्यांची बैठक पार पडली होती. त्या बैठकीस 217 मुख्याध्यापक व प्राचार्य उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या