सांगली : स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात आणि वाढीव वीजबिलांच्या प्रश्नावर स्मार्ट मीटर हटाओ कृती समिती, सांगली जिल्हा यांच्या वतीने १ सप्टेंबर रोजी जिल्हाव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यासाठी समितीचे अध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांनी निमंत्रकांसह माजी मंत्री व आमदार मा. जयंत पाटील यांची भेट घेतली.
यावेळी चंदनदादा चव्हाण यांनी स्मार्ट मीटरमुळे निर्माण झालेल्या वीज ग्राहकांच्या विविध समस्यांची माहिती देत १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जिल्हाव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.
यावर बोलताना मा. जयंत पाटील यांनी स्मार्ट मीटरमुळे होणाऱ्या वाढीव वीजबिलांच्या प्रश्नावर आपण विधानसभेतही आवाज उठवला असल्याचे सांगितले. तसेच आता रस्त्यावरच्या या लढाईतही सक्रिय सहभाग घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
दरम्यान, आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळवण्यासाठी समितीच्या वतीने जिल्ह्यातील इतर राजकीय व सामाजिक नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनाही आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे.
या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. संजय बजाज, मा. आशिफभाई बावा, मा. लालुभाई मेस्त्री, मा. सुभाष तोडकर, रामदास सावंत, अक्षय पवार आदी उपस्थित होते.
१ सप्टेंबरच्या आंदोलनामुळे स्मार्ट मीटरच्या प्रश्नावर सांगली जिल्ह्यातील जनतेचा आवाज अधिक बुलंद होणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.