नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या क्रीडा मैदानावर पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो खो (पुरूष) स्पर्धा सुरू आहेत. बाद फेरीतून पात्रता फेरीत दाखल होण्यासाठी संघात मोठी चुरस निर्माण झाली होती. अतिशय चुरशीचे व अटीतटीच्या सामन्यात महाराष्ट्रातील चार विद्यापीठाने बाजी मारली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे आणि मुंबई विद्यापीठ, मुंबई या विद्यापीठांनी पात्रता फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.
येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या क्रीडांगणावर पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो खो (पुरूष) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पाच राज्यातील विविध विद्यापीठाचे संघ सहभागी झाले आहेत. दि.५ एप्रिल, २०२६ रोजी सकाळच्या सत्रात बाद फेरीतून आलेले चार विद्यापीठाचे संघ अनुक्रमे गोवा, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर संघ पात्रता फेरीत दाखल होण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाशी झुंजले. परंतु या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पात्रता फेरीत दाखल होण्याचे स्वप्न भंगले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या संघाने गोवा विद्यापीठ, गोवा संघावर ११ गुणांनी मात केली. त्यामुळे नांदेड विद्यापीठाने पात्रता फेरीत सहज प्रवेश केला. त्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ.अशोक महाजन, कुलसचिव डॉ.डी.डी.पवार, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ.भास्कर माने, संघाचे प्रशिक्षक पवन पाटील, व्यवस्थापक महेश वाखरडकर आदींनी संघाचे कौतुक केले.
मुंबई विद्यापीठ व संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती यांच्यात अत्यंत अटीतटीच्या सामन्यात मुंबई विद्यापीठ ५ गुणांच्या फरकाने विजयी झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर यांच्यात सामना रंगला छत्रपती संभाजीनगर विद्यापीठ संघ ६ गुणांच्या फरकाने विजयी झाले. सावित्रिबाई फुले विद्यापीठ पुणे व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघातील सामना रंगतदार झाला. क्षणाक्षणाला उत्कंठावर्धक सामन्यात पुणे विद्यापीठाने १ गुणांच्या फरकाने सामना जिंकला.
पात्रता फेरीत दाखल झालेल्या महाराष्ट्रातील चार संघात आता साखळी सामने होणार आहेत. चारही संघात दमदार, गुणी, आक्रमण व बचावात्मक कौशल्यात निपुण असलेल्या अष्टपैलू खेळाडूंची संख्या आहे. त्यामुळे या चार संघात कोण विजयी व उपविजयी ठरणार आहे. याची क्रीडा प्रेमींना मोठी उत्सुकता लागली आहे. दि.६ एप्रिल रोजी यांचा निर्णय होणार असून बक्षिस वितरण कार्यक्रम याच दिवशी सायंकाळी होणार आहे.