साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांची जयंती शारदा भवन हायस्कूल येथे उत्साहात साजरी;भाषण व निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 03/08/2026 3:58 PM

अर्धापूर :- साहित्यरत्न,लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त श्री शारदा भवन हायस्कूल, अर्धापूर येथे विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. यानिमित्त शाळेमध्ये भाषण स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्य, साहित्यसंपदा, सामाजिक समतेचा संदेश, श्रमसंस्कृती, शिक्षणाचे महत्त्व आणि परिवर्तनवादी विचार यांवर प्रभावी मते मांडली.
     कार्यक्रमाच्या प्रारंभी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस शाळेचे मुख्याध्यापक श्री अरूण कल्याणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक श्री अरूण कल्याणकर यांनी आपल्या मनोगतात  विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, "आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून समाजातील वंचित, शोषित व कष्टकरी घटकांच्या वेदनांना वाचा फोडली. त्यांच्या विचारांतून समता, बंधुता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा संदेश मिळतो. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून संघर्ष, जिद्द, स्वाभिमान आणि समाजसेवेची प्रेरणा घ्यावी."
    भाषण स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य, लोककला, परिवर्तनवादी विचारसरणी तसेच राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेल्या योगदानावर अभ्यासपूर्ण व प्रभावी भाषणे सादर केली. निबंध स्पर्धेसाठी पर्यवेक्षक म्हणून जेष्ठ शिक्षक जी.बी.मदने,व प्रकाश कदम यांनी काम पाहिले.निबंध स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट लेखनकौशल्याचे दर्शन घडवित त्यांच्या कार्याचा सखोल अभ्यास मांडला. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती, वक्तृत्वकला, लेखनकौशल्य आणि सामाजिक जाणीवा अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.
    कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री प्रकाश कदम यांनी केले. त्यांनी आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनप्रवासाचा प्रेरणादायी आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या साहित्याचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. 
   या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील जेष्ठ अनिल सवडतकर, जेष्ठ आर. एस. खांडरे, जेष्ठ शिक्षक जी.बी.मदने, जेष्ठ एस. एस. डोईबोळे, आर. एम. खडकीकर, नागेश बोचकरी, बी. एम. मोकमपल्ले, ए. ए. राऊतवाड, एस. एम. दापकेकर, बी. जी. आवरे, आय. एस. शेख, वाय. जी. टिप्परसे आत्माराम कदम, प्रकाश कदम,आर.जी.पाटील, आर. बी. लोकरे, एस. पी. भालेराव, पी. एस. तेलंग, डी. बी. पंडीत, आणि  पी. डब्ल्यू. लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
      विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व उत्साही सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढविली. उपस्थितांनी डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा अंगीकार करून समतामूलक, सुसंस्कृत व प्रगत समाज घडविण्याचा संकल्प व्यक्त केला.
    या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये साहित्यप्रेम, सामाजिक उत्तरदायित्व, राष्ट्रीय मूल्ये आणि भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य व बंधुता या मूल्यांविषयी जागरूकता निर्माण झाली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत यशस्वी ठरला.

Share

Other News

ताज्या बातम्या