नांदेड :- मुखेड शहरात विनापरवाना बिटी कापुस बियाणाची विक्री केल्या प्रकरणी तेलंगना राज्यातील श्रीधर पेन्शलवार विरुध्द मुखेड पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला या कार्यवाहीत सुमारे 12 लाख 37 हजार 992 रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
दिनांक 1 जुन रोजी रात्री मुखेड येथे नवा मोंढा परीसरातील संगमेश्वर कृषि सेवा केंद्राजवळ एका कारमधुन अनाधीकृत रित्या विनापरवाना बिटी कापुस बियाणांची विक्री सुरु असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली त्यानुसार जिल्हास्तरीय भरारी पथकातील पथक अध्यक्ष मोहिम अधिकारी जिल्हा परीषद सचिन कपाळे, जिल्हा भरारी पथकातील सदस्य सचिव व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अमोल पेकम, विभागीय कृषि सहसंचालक कार्यालयातील गुणनियंत्रण तंत्र अधिकारी बालाजी मुंडे, मुखेड पंचायत समितीचे कृषि अधिकारी(गुनि)अरविंद आकात, मुखेड कृषि अधिकारी कार्यालयातील गुणनियंत्रण निरिक्षक कुलदिप वाघमारे यांच्या पथकाने संयुक्त कार्यवाही केली.
तपासणी दरम्यान तेलंगणा राज्यातील भैसा येथील श्रीधर पेन्शलवार हा कारमध्ये (टिजी १८ ए ४९७०) बीटी कापूस बियाण्यांचा साठा घेऊन विक्रीसाठी आला असल्याचे आढळून आले. वाहनातील पोत्यांची तपासणी केली असता आरसीएच-६६८ वाणाचे एकूण 192 पाकिटे आढळून आली. या बियाण्यांची किंमत सुमारे १ लाख ८७ हजार ९९४ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय कार १० लाख ५० हजार असा एकूण १२ लाख ३७ हजार ९९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशी दरम्यान संबंधिताकडे महाराष्ट्रात बीटी कापूस बियाणे विक्री करण्यासाठी आवश्यक परवाना, पक्की पावती अथवा वैध कागदपत्रे नसल्याचे समोर आले. तसेच संबंधित वाणाला महाराष्ट्रात विक्री परवाना नसल्याची माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनीने दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. संशयित बियाण्यांचे नमुने घेऊन ते बीज परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी श्रीधर पेन्शलवार (रा. भैसा, जि. निर्मल, तेलंगणा) याच्याविरुद्ध बीज अधिनियम १९६६, बीज नियम १९६८, बियाणे (नियंत्रण) आदेश १९८३ तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यामध्ये कुठेही अप्रमाणित बियाणे विक्री होत असल्यास तात्काळ कृषि विभागाकडे संपर्क साधावा तसेच रासायनिक खतांची जादा दराने विक्री होत असल्यास किंवा विनापरवाना विक्री होत असेल अथवा खते उपलब्ध असतांना विक्री करत नसल्यास तात्काळ कृषी विभागाकडे संपर्क साधावा, परवानाधारक कृषि निविष्ठा केंद्रातूनच निविष्ठा खरेदी कराव्यात असे आवाहन कृषी विभागामार्फत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.