सुधागडला पावसाने झोडपले , अंबा नदीचा प्रवाह वाढला

  • M.Samir Mahadkar (Mhasla )
  • Upadted: 04/08/2020 3:04 PM

सुधागडसह संपुर्ण रायगड जिल्ह्यात सलग दोन दिवसापासून मुसळधार पावसाने हाहाकार माजविला आहे. मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने सकाळी पाली, जांभुळपाड्यासह सुधागडात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले.

 पाली खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील पाली व जांभुळपाडा तसेच तामसोली पूल व गावाला अंबा नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने वेढा घातला आहे. अशातच नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला. कोरोना व अतिवृष्टीने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. पाली, पेडली व परळी बाजारपेठेत देखील पावसाचा परिणाम होत ग्राहकांची संख्या रोडावल्याचे दिसून आले. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

 सलग दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सखोल व खोलगट भागात पाणी शिरले आहे. तर नद्या, नाले, दुथडी भरुन वाहत आहेत. येथील गावांना जोडणार्‍या पुलांवरुन पाणी वाहत असल्याने वाहतुकीस अडसर निर्माण झाल्याचे दिसून आले. पाली बसस्थानक परिसरात पाणी साचल्याचे दिसून आले. मात्र बसेस सुरू नसल्याने प्रवाशांना दरवर्षीप्रमाणे होणारा त्रास झाला नाही.

 दरडग्रस्त, सखल भागातील नागरिकांनी योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी जाऊन स्थलांतर करावे. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. पुराच्या पाण्यातून वाहने चालवू नयेत, इलेक्ट्रिक पोल्स, स्विच बोर्ड, इलेक्ट्रिक वायर्स यांना हात लावू नये, यापासून दूर राहावे. स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावे, त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या