पुणे,
देश, देशाची राज्यघटना आणि लोकांचे खरे बोलण्याचे स्वातंत्र्य धोक्यात आहे. कोणी एकादी नटी काही बोलते, एकदा दाडीवालाबाबा काही बोलतो. पण सर्वसामान्यांना खरे बोलण्याचे स्वातंत्र्य राहिलेले नाही. एका अनामिक भितिखाली लोक खरे बोलत नाहीत. शेतकरी वर्षभर शांततेत आंदोलन करतात, कामगार रस्त्यावर आहेत. कोणी कोणाला समजून घेत नाही, कोणी कोणाला समजून सांगण्याच्या फंदात पडत नाही. यामुळे देशात लोकशाहीविरोधी प्रचंड कोंडी झाली आहे. ती कोंडी फक्त लेखकच फोडू शकतो. यासाठी आता लेखकांनी पुढे आले पाहिजे. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले. ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक ग्रंथ पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम होते. येथील एसेम जोशी सभागृहात झालेल्या समारंभात दोन वर्षाचे जीवनगौरव व ग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ साहत्यिक डॉ. अनिल अवचट व डॉ. न. म. जोशी यांचा जीवनगौरव पुरस्काराने तर कोल्हापूरचे डॉ. सुनीलकुमार लवटे व इंदोरचे मोहन रेडगावकर यांना भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विविध गटातील वार्षिक ग्रंथ पुरस्कार देण्यात आले. यामध्ये कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनाच्या शेतकरी स्वातंत्र्याची रणनीती या पुस्तकाला ज. रा. कदम पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार रावसाहेब पुजारी यांनी स्वीकारला. तसेच इचलकरंजीच्या राजेंद्र मुठाने यांना मसाप कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,
पुणे येथे गुरुवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार रावसाहेब कसबे यांच्या हस्ते स्वीकारताना रावसाहेब पुजारी, व्यासपीठावर राजीव बर्वे, मोहन रेडगावकर, डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. न. म. जोशी, डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे आदि मान्यवर उपस्थीत होते.