' हर घर तिरंगा' मोहिमेचा सांगलीत जल्लोष...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/08/2026 12:30 AM

** भव्य सायकल आणि ई-बाईक रॅलीद्वारे देशभक्तीचा संदेश!

विश्रामबाग ते स्टेशन चौक रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘निरोगी भारत, समृद्ध भारत’चा केला संकल्प

 स्वातंत्र्य दिनाच्या ८० व्या वर्षाच्या अमृतमहोत्सवी पर्वाचे औचित्य साधून आणि ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने आज शुक्रवारी सकाळी एका ‘भव्य सायकल आणि ई-बाईक रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीने संपूर्ण सांगली शहर तिरंगामय झाले होते.

सकाळी ७:०० वाजता विश्रामबाग चौक, सांगली येथून या रॅलीचा दिमाखदार शुभारंभ झाला. ही रॅली विश्रामबाग चौक-मार्केट यार्ड-पुष्पराज चौक-राममंदिर-काँग्रेस भवन मार्गे स्टेशन चौक (सांगली) येथे संपन्न झाली. रॅलीमध्ये महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सायकलप्रेमी आणि नागरिक यांनी मोठ्या संख्येने तिरंगा ध्वज हाती घेऊन आणि सायकलींवर तिरंगा लावून सहभाग नोंदविला.

केवळ स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करणे हा या रॅलीचा उद्देश नसून, ‘निरोगी भारत, समृद्ध भारत’ हा संदेशही यातून देण्यात आला. पर्यावरणपूरक प्रवास आणि शारीरिक आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्त्व अधोरेखित करत, नागरिकांनी एकजुटीने राष्ट्रभक्तीची भावना व्यक्त केली.

महानगरपालिकेच्या सर्व विभागप्रमुखांनी आणि कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. ‘हर घर तिरंगा’ अभियान २०२६ अंतर्गत नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल जनजागृती व्हावी आणि देशाबद्दलची देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत व्हावी, हा या रॅलीचा मुख्य हेतू होता.

नागरिकांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सांगली शहरातील वातावरण देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व सायकलप्रेमींचे आणि नागरिकांचे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. चला, आपल्या प्रकृतीची काळजी घेऊया आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले योगदान देऊया, असा संकल्प यावेळी सर्वांनी केला.


Share

Other News

ताज्या बातम्या