नमस्कार सांगलीकर,
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महापौरपदी श्री. धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौरपदी श्री. गजानन मगदूम यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! ही निवड शहराच्या विकासाला नवी गती देणारी ठरो, हीच अपेक्षा.
महानगरपालिकेची विस्कळीत झालेली आर्थिक आणि प्रशासकीय 'घडी' पुन्हा बसवणे, हे नूतन कारभाऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे. केवळ घरपट्टी आणि पाणीपट्टीवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे नवे स्रोत शोधणे आता काळाची गरज बनली आहे.
'लोकहित मंच, सांगली'च्या माध्यमातून आम्ही काही महत्त्वाच्या मागण्या आणि सूचना मांडत आहोत:
✅ वाहतूक आणि पायाभूत सुविधा: ई-बस सेवा सुरू करणे, शहरात मल्टिलेव्हल पार्किंगची सोय करणे आणि महत्त्वाच्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे.
✅ पर्यटन विकास: सांगलीतील गणपती मंदिर, हरिपूर, औदुंबर, नृसिंहवाडी या धार्मिक स्थळांना जोडणारी 'टुरिस्ट बस सेवा' सुरू करावी.
✅ स्वच्छता आणि आरोग्य: महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी दर्जेदार स्वच्छतागृहे, शहरात वॉटर एटीएम आणि कचरा उठावासाठी 'घंटागाड्यांचे' प्रभावी नियोजन.
✅ महिला सक्षमीकरण: बचत गटांतील महिलांना ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठी शासकीय योजनांतून अर्थसाहाय्य मिळवून देणे.
✅ प्रलंबित प्रश्न: कवलापूर विमानतळाला गती देणे, बंद पडलेली बाल रेल्वे सुरू करणे आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे.
सांगलीला एक 'स्मार्ट' आणि 'सुंदर' शहर बनवण्यासाठी फक्त घोषणा नकोत, तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. नवीन महापौरांनी या सर्व प्रश्नांची तड लावून जनतेला दिलासा द्यावा, अशी आमची मागणी आहे.
आपला नम्र,
मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली