क्रांतिकारक भगूरपुत्र बाबाराव सावरकर यांचा आज ७८ वा स्मृतीदिन आज भगूर येथील सावरकर स्मारकात साजरा करण्यात आला.
प्रसंगी सुभाष पुजारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसेच यावेळी मनोज कुवर यांनी
बाबाराव सावरकर यांच्या विषयी सांगितले कि, बाबारावांचा ब्रिटीश शासनाशी पहिला संघर्ष १९०६ साली उडाला. नाशिकमध्ये जाहीर सभा घेण्यास असलेली बंदी मोडली, या गुन्ह्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आणि १० रुपये दंड करण्यात आला. बाबारावांनी याविरुद्ध वरिष्ठ न्यायालयाकडे दाद मागितली आणि त्यांचा दंड रद्द झाला. २७ सप्टेंबर १९०६ रोजी दसर्यानिमित्त नाशिक येथील कालिकेच्या मंदिराकडून सीमोल्लंघन करून परतणार्या तरुणांनी `वन्दे मातरम्'चा जयघोष केला. तो ऐकून एका पोलिसाने `बोंब मारणे बंद करा', असे म्हणत बाबांच्या अंगावर हात टाकला. मात्र त्या पोलिसावरच पश्चात्तापाची पाळी आली. बाबांसकट सर्वांनीच त्या पोलिसाला ठोकून काढले ! या प्रसंगाने संतप्त झालेल्या ब्रिटीश सरकारने ११ तरुणांवर अभियोग भरला. `वन्दे मातरम् अभियोग' या नावाने तो गाजला. यात बाबाराव मुख्य आरोपी होते. नाशिक जिल्ह्यात हा अभियोग निरनिराळया ठिकाणी सहा महिने चालला; कारण न्यायाधीश फिरतीवर असत आणि ते असतील तेथे हा अभियोग चालत असे. या अभियोगात बाबारावांना २० रुपये दंड होऊन मोठ्या रकमेचा प्रतिभू (जामीन) मागण्यात आला. अन्य तरुणांनाही अशाच प्रकारच्या शिक्षा झाल्या. बाबाराव नाशिकमध्ये असतांना त्यांनी राष्ट्रहिताच्या दृष्टीने मूलभूत स्वरूपाच्या अनेक चळवळी सुरू केल्या. स्वदेशी चळवळ, विलायती मालावर बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षणाची सुरुवात इत्यादी चळवळींचे सूत्रसंचालन बाबाराव धुरिणत्वाने करत असत.
यावेळी भुषण कापसे, आकाश नेहरे, सौरभ कुलकर्णी, खंडु रामगडे, भाऊसाहेब ससाणे सुनिल जोरे, शंकर मुढारे आदी उपस्थित होते.