नांदेड :- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून शासन आपल्या दारी आले असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेला एकाच ठिकाणी मिळत आहे, असे मत नांदेड उत्तर विधानसभेचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक एक अंतर्गत नांदेड तालुक्यातील नाळेश्वर महसूल मंडळात आज 17 एप्रिल रोजी नाळेश्वर येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन आमदार कल्याणकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण मुंडे, लिंबगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरी बोधनकर, नायब तहसीलदार महसूल सुनील माचेवाड, नायब तहसीलदार निवडणूक इंद्रजीत गरड, सरपंच उषाताई वाघ, नरहरी वाघ, पंढरी पाटील बोकारे, नारायण पाटील कदम खडकीकर, अनिल पाटील क्षीरसागर, संतोष भारसावडे, धनंजय पावडे, नवनाथ काकडे, वैद्यकीय अधिकारी रहाटी डॉ.राठोड, मंडळ कृषी अधिकारी सानप ,पोलीस उपनिरीक्षक पोफळे, अनुलोमचे पांडुरंग बुद्धेवार, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार कल्याणकर पुढे बोलताना म्हणाले की, महाराजस्व समाधान शिबिरात विविध विभागाचे स्टॉल लावण्यात येऊन विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. जनतेला याचा फायदा होत आहे.
कार्यक्रमाचे आरंभी जिल्हा परिषद नाळेश्वर शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार संजय वारकड यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. उपविभागीय अधिकारी नांदेड डॉ.सचिन खल्लाळ यांनी विविध विभागांचे स्टॉल लावून योजना सामान्य पर्यंत पोहचत असल्याने नागरिक आणि प्रशासन यांच्या मधील नाळ अधिक घट्ट होत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात 180 शेतकऱ्यांना सातबारा व 180 शेतकऱ्यांना 8-अ चे दाखले वाटप करण्यात आले. तसेच उत्पन्नाचे-65, रहिवासी-140, जातीचे-60 प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच संजय गांधी योजनेच्या-16 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. या कार्यक्रमात विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते त्यात प्रामुख्याने महसूल विभाग, निवडणूक विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग, कृषी विभाग, महिला व बाल विकास प्रकल्प विभाग, पुरवठा विभाग,आरोग्य विभाग, विशेष सहाय्य विभाग, आपले सरकार सेतू केंद्र, ग्रामविकास विभाग, भूमी अभिलेख विभाग, शिक्षण विभाग व अनुलोम सामाजिक संस्था यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन लाभ दिला. या कार्यक्रमास नाळेश्वर महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी कुणाल जगताप, ग्राम महसूल अधिकारी मारोती कदम, राजेश बरोडा, अंकुर सकवान, महेश जोशी, गजानन होळगे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच सुनीता परोडवाड, प्रितीका मुडगुलवार, प्रतिभा मारतळेकर, संतोष वाघमारे, अनुलोमचे कृष्णा इंगळे, मंडळ अधिकारी रूपाली वाठोरे, श्रीकृष्ण ऐलमटे , प्रमोद बडवणे, शिवाजी तोटरे, मारुती जमदाडे, मनोज सरपे, रमेश गिरी, माधव भिसे, मारुती श्रीरामे व तालुक्यातील सर्व महसूल सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम महसुल अधिकारी अश्विनी गिरडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी नाळेश्वर कुणाल जगताप यांनी मानले. या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.