नगरसेवक कसा असावा आणि कसा नसावा

  • रोहित बोंबार्डे (तुमसर )
  • Upadted: 26/06/2022 12:59 PM



रोहित बोंबार्डे
प्रतिनिधी तुमसर :--नगरसेवक त्या त्या वॉर्डमधील ज्येष्ठ, अनुभवी, सुशिक्षित आणि साधारणपणे नागरिकांशी सुख-दु:खाशी एकरूप आणि समरस होणारा लोकप्रतिनिधी निवडला जात असे. ठराविक मर्यादेमध्ये समाजकारण आणि राजकारणात त्याला विशेष असे महत्वही होते.नगरसेवक या पदाला पूर्वी मान होता, प्रतिष्ठा होती आणि या मेहेरबान अशा आदरार्थी नावाने नगरसेवकांना सन्मानपूर्वक बोलावलेही जायचे परंतु  गेल्या 15 वर्षांमध्ये "नगरसेवक' या पदाची प्रतिष्ठा संपली आहे काय? नगरसेवक हा शब्द वाईट अर्थाने म्हटला जातोय की काय? अशी शंका यावी इतके राजकीय वातावरण गढूळ झाले आहे. ज्या लोकांचे, नागरिकांचे, प्रभागातील रहिवाशांचे आपण लोकप्रतिनिधीत्व करतो, त्या लोकप्रतिनिधीची म्हणजेच नगरसेवकांची नेमकी कर्तव्ये काय आणि नेमके कोणते कार्य नगरसेवकाकडून अपेक्षित आहे, याचा विचार, चर्चा निश्चितच झाली पाहिजे. गेल्या  सुमारे 15 वर्षांमध्ये नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी यांची व्याख्याच बदलून गेली आहे. कुठले तरी स्वार्थ घेवून एखाद्या पक्षाचे तिकिट मिळवणे व पक्षाचे तो व्यक्ति आपल्या प्रभागाशी किती प्रमाणिक ,कार्यतत्पर आहे हे न तपासता तिकिट विकणे त्या प्रभागाशी निकोप समाजाच्या दृष्टीने हे योग्य आहे काय? भविष्याच्या दृष्टीने हे चांगले नाही तसेच समाजहिताचे नाही. नागरिकांनी, विद्यमान नगरसेवकांनी, समाजातील ज्येष्ठ आणि बुध्दिवादी म्हणवून घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नगरपालिकेची सत्ता ज्या नेतेमंडळींकडे होती त्या नेतेमंडळींनी अतिशय गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्या शहराच्या भविष्यासाठी भावी पिढीच्या हितासाठी दूरदृष्टी ठेवून काही धोरणात्मक निर्णय त्याला घ्यावे लागतील. कारण निवडून आल्यावर पाच वर्षात नगरसेवक मतदारांना तोंड दाख‍वत नाहीत असा सर्वसामान्यांचा अनुभव आहे.प्रत्येक नागरिकानी स्वतःची व नगरसेवकांची कर्तव्ये जाणून घेण्याची गरज आहे.

 
कर्तव्ये नगरसेवकांची

आपल्या प्रभागातील नगरपालिकेशी संबंधित अशा समस्यांची नगरसेवकाला माहिती व जाणीव असावी. नगरपालिकेच्या कायद्याची जाण असावी व समजही असावी. नगरपालिकेस निधी कसा उपलब्ध होतो आणि तो निधी कोणकोणत्या कारणासाठी खर्च करावा लागतो, याचेही ज्ञान नगरसेवकाला असावे.आपल्या शहरामध्ये पुढील 50 वर्षांचा धोरणात्मक दृष्टिकोन ठेवून कायमस्वरूपी कोणती कामे राबवावीत, याचाही अभ्यास सर्व नगरसेवकांना असणे अत्यंत आवश्यक आहे.कमीत कमी पैशात नगरपालिकेमार्फत जास्तीत जास्त सार्वजनिक काम कसे करून घेता येईल, याचाही नगरसेवकांनी जाणीव-पूर्वक प्रयत्न केला पाहिजे. नागरिकांच्या नगरपालिकेमार्फत ज्या दैनंदिन गरजा आहेत, त्या गरजांसाठी अभ्यासपूर्ण रितीने व कार्यक्षमतेने नियोजनबध्द असा कायमस्वरूपी कार्यक्रम आखून देणे हे नगरसेवकांचे महत्वाचे काम असून त्यासाठी सर्व नगरसेवकांनी एकत्रितरित्या हा कार्यक्रम, हे धोरण राबविले पाहिजे म्हणजे लहानसहान कामासाठी छोट्या-मोठ्या कामांसाठी नगरसेवकांचा, सेवकवर्गाचा आणि चतुर्थश्रेणी कामगारांच्या वेळेचा अपव्यय होणार नाही. नगरपालिकांच्या हद्दीमध्ये पुरेशा रूंद रस्त्याचा अभाव, पार्किंगच्या जागांचा अभाव, वाहतूक यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचा अभाव आणि विविध सार्वजनिक कारणांसाठी म्हणजे खेळाची मैदाने, प्रदूषण टाळण्यासाठी मोठमोठी उद्याने, सार्वजनिक स्वच्छतागृहे, भाजीमंडई सर्वसोयींनी-युक्त अशी अद्यावत मार्केटस या सुविधांची टंचाई आहे. नगरपालिकेच्या हद्दीमध्ये मंजूर डेव्हलपमेंट प्लॅन राबवण्या-साठी एकत्रित प्रयत्न करणे हे देखील नगरसेवकांचे आद्य कर्तव्य आहे. 
नगरपालिका शाळेतील साहित्य खरेदी व ‌पालिका शाळेत शिकणाऱ्या मुलांचा शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने निर्णय पाठपुरावा नगरसेवकांनी केला पाहिजे. नगरपालिकेमार्फत सार्वजनिक हिताची विकासकामे करताना ती टक्केवारीशिवाय झाली पाहिजेत आणि कमीत कमी पैशात जास्तीत जास्त कामे झाली पाहिजेत. नगरपालिकेचे उत्पन्न जास्तीत जास्त वाढवून नगरपालिकेच्या अंदाज-पत्रकाचा अभ्यास करून दरवर्षी पुढील वर्षासाठी योग्य ते धोरण ठरवले जावे.राज्य शासन व केंद्र शासन यांच्याकडून शहरातील विविध कामांसाठी कायमस्वरूपी कामांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून आणणे आणि त्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती नगरसेवकांना असावी. नागरिकांच्या दैनंदिन समस्या जाणून घेण्यासाठी किमान 60 दिवसातून एकदा तरी नागरिकांची सर्वसमावेशक अशी, "वॉर्ड सभा' आयोजित करून समस्यांचा आढावा घ्यावा. त्या समस्यांचे निराकरण लवकरात लवकर नगरपालिकेद्वारे व्हावे. शहरातील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन साफसफाई, स्वच्छता, कचरा व घनकचऱ्याचे निर्मूलन वगैरे सर्व बाबींकडे काटेकारपणे लक्ष द्यावे.नागरिकांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी जागरूकतेने सर्वच बाबी म्हणजे भारनियमन, पाण्याची वॉल्व्ह सोडणे तसेच जमिनीखालून वेळोवेळी नगरसेवकांच्या किंवा काही वेळा नागरिकांच्या इच्छेप्रमाणे घातल्या जाणाऱ्या पाईपलाईनच्या गुंतागुंतीचा अभ्यास असणे आणि त्यावर एकत्रितरित्या विचार करून ठोस निर्णय घेणे हे महत्त्वाचे आहे. शहरामध्ये स्त्री-पुरूषांसाठी ठिकठिकाणी अद्यावत अशी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उभारणी व्हावी.छोट्या छोट्या दुकानगाळ्यांची मार्केट बांधून अशा मार्केटच्याद्वारे परदेशात जो करोडो रूपयांचा व्यापारधंदा केला जातो, त्याचाही नगरसेवकांनी अभ्यास करावा. आपल्या शहरामध्ये अशी योजना कार्यान्वित करता येते का, असाही प्रयत्न करावा.
निवडणूक आल्यावर प्रचारात सर्वच पक्षाचे उमेदवार मतदारांच्या दारात मतांचा जोगवा मागून जातात निवडून आल्यावर पाच वर्षांत पुन्हा नगरसेवक मतदारांना तोंड दाख‍वत नाहीत, असा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. पण दुसरीकडे प्रत्येक नागरिकानेही स्वतःची व नगरसेवकांची कर्तव्ये जाणून घेण्याची गरज आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या