रोगांमुळे पीक नष्ट झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्यानी तातडीने पिक विमा योजनेचा लाभ मिळवून द्यावा
शासनाकडे कारवाई करण्याची पत्राद्वारे केली विनंती
गडचिरोली दि.१७ ऑक्टों २० :-
गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे व महापुरामुळे पिकांवर फार मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक नष्ट झाले असून त्यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. मात्र पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास टाळाटाळ करीत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. त्यामुळे पिक विमा कंपन्यांनी पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून त्यांच्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ.डॉ.देवराव होळी यांनी शासनाला पत्राद्वारे केली असून पीक विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या विमा कंपन्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणीही केली आहे.
जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचा पीक विमा काढलेला आहे. परंतु नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना बांधावर येवून पंचनामे करण्याची विनंती करतात तेव्हा ते प्रतिनिधी टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच आजची वेळ उद्यावर मारून नेण्याचा प्रकारही सुरू आहे.
यामुळे शेतकऱ्यांना आपण काढलेल्या पीक विम्याचा लाभ मिळणार की नाही याची शंका निर्माण झाली आहे त्यामुळे शासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे व याबाबत हयगय करण्याऱ्या विमा कंपन्यांवर तातडीने कारवाई करावी व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पिक विमा योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ.डॉ.देवराव होळी यांनी शासनाला पत्राद्वारे केली आहे.
निखील राखडे (गडचिरोली जिल्हा मुख्य प्रतिनिधी)
7774807014