नांदेड :- राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने ‘आनंदाचा शिधा’ पोहचविण्याचा निर्णय घेतला आहे. ही अत्यंत अभिनव व आवश्यक अशी योजना असून यात पात्र गरजूंना या आनंदाच्या विविध प्रसंगासाठी मोठी मदत झाली आहे. किनवट हे तेलंगणाच्या सीमेवर असून या भागातील पात्र गरजूना याचा विशेष लाभ होणार असल्याचे प्रतिपादन आमदार भिमराव केराम यांनी केले. किनवट येथे त्यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटपाचा प्रातिनिधीक प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले, तहसिलदार डॉ. मृणाल जाधव व इतर अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र रेषेवरील (एपीएल), केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरणास आज नांदेड जिल्ह्यातील किनवट येथुन प्रारंभ करण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांसाठी एकूण 5 लाख 93 हजार शिधाजिन्नस (पॅकेट) संच मंजूर केले आहेत. यासाठी पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा पोहचविण्याचे नियोजन केले आहे.