प्रादेशिक हवामान विभागाची पूर्वसूचना
जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
रायगड जिल्ह्यात 4 ते 6 ऑगस्टदरम्यान मुसळधार अतिवृष्टीची शक्यता असून, तशी पूर्वसूचना प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नदी परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनांनुसार 4 ते 6 ऑगस्ट या कालावधीत रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यात कालपासून कोसळणार्या पावसामुळे महाडमधील सावित्री, रोह्यातील कुंडलिका या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्यात आजपासून तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्याने नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
तसेच दरडग्रस्त, सखल भागातील नागरिकांनी योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी जाऊन स्थलांतर करावे. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. पुराच्या पाण्यातून वाहने चालवू नयेत, विद्युत खांब, स्विच बोर्ड, इलेक्ट्रीक वायर्स यांना हात लावू नये, यापासून दूर रहावे. स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावे, त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.