उल्हास नदीतील जलपर्णीच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढणार

  • Mahesh Salunke (Dombivali )
  • Upadted: 28/02/2021 7:26 AM

उल्हास नदीतील जलपर्णीच्या समस्येवर
कायमस्वरुपी तोडगा काढणार
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
 
ठाणे  - ठाणे जिल्ह्यातील बव्हंशी नागरी भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत दरवर्षी उद्भवणाऱ्या जलपर्णीच्या समस्येवर जैव तंत्रज्ञानाच्या साह्याने कायमस्वरुपी तोडगा काढण्यात येत असल्याची ग्वाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

 सध्या अस्तित्वात असलेल्या जलपर्णी जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने नष्ट करून, नदीचे पाणी शुद्ध करून पुन्हा जलपर्णी निर्माण होऊ नयेत, यासाठी पावले उचलण्यात येत असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे नितीन निकम, कैलास शिंदे आणि उमेश बोरगावकर आंबिवली नजीक उल्हास नदीजवळ आंदोलनाला बसले होते. श्री. शिंदे यांनी शनिवारी त्यांची भेट घेतली. याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उल्हासनगर महापालिका आयुक्त ए. एन. राजा, जिल्हा परिषद सीईओ, तसेच सगुणा बागेचे प्रगतिशील शेतकरी व मायक्रोबायॉलॉजिस्ट शेखर भडसावळे, आमदार विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे आदी उपस्थित होते.

 श्री. शिंदे यांनी दिलेल्या ग्वाहीनंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.

श्री. भडसावळे यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने औरंगाबाद येथे ४० एकरवर पसरलेल्या डॉ. सलीम अली तलावातील जलपर्णी दोन वर्षांपूर्वी नष्ट करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षात तिथे ही समस्या पुन्हा उद्भवलेली नाही. याच तंत्रज्ञानाची मदत उल्हास नदीतील जलपर्णीची समस्या निकाली काढण्यासाठी घेण्यात येणार आहे. तसेच, तातडीची बाब म्हणून सोमवार पासून मॅन्युअल पद्धतीने जलपर्णी काढण्यास सुरुवात करण्याचे आदेश श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.
उल्हास नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिका यांच्या माध्यमातून एसटीपी उभारले जात आहेत. खेमाणी येथील एसटीपीचे काम पूर्ण झाले असून कल्याण-डोंबिवली हद्दीतील ५ एसटीपीचे काम मे अखेरीपर्यंत पूर्ण होणार आहे. म्हारळ नाल्यावरही एसटीपी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी यावेळी दिले. तसेच तातडीची बाब म्हणून या नाल्याच्या मुखाशी बांध घालून सांडपाणी थेट नदीत मिसळणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी दिले.

Share

Other News

ताज्या बातम्या