कोरोनाबाबत नागपूर विभागाच्या दूरचित्र बैठकीत दिले निर्देश
गडचिरोली ( दि.२७ फेब्रु ) :-
लॉकडाऊनच्या भितीने पून्हा नागरिक धास्तावलेले आहेत. तसेच कोरोना बाबत काळजी न घेता त्यांचा वावरही सार्वजनिक ठिकाणी सुरू आहे. राज्यात कोरोना पून्हा वर डोके काढत असून संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांची कडक स्वरूपात अंमलबजावणी करावी असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दूरचित्र बैठकी द्वारे सर्व जिल्हाधिकारी यांना दिले. ते म्हणाले की राज्यात पून्हा लॉकडाऊन होणार नाही हे खरे आहे. कामानिमित्त बाहेर गेलेल्या लोकांनी काळजी करू नये. अर्थिक चक्र पुर्ववत येत असताना पुन्हा लॉकडाऊन न करता आपण काळजी घेवू व संसर्गाला रोखू. हे करत असताना कित्येक लोक अकारण नियमांचे उल्लघन करत असतील तर त्यांना नियमांचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. त्यांच्यावर कडक कारवाई करा असे निर्देश मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपस्थितांना दिले. यावेळी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, प्रभारी जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर, निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटिल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर व डॉ.विनोद मशाखेत्री उपस्थित होते.
यावेळी कुमार आशिर्वाद यांनी जिल्हयातील रूग्ण, दैनंदिन चाचण्या, कोरोना रूग्णलये व स्टाफ या बद्दलची माहिती दिली. या बैठकीत मंत्री महोदयांनी गरज नसलेल्या ठिकाणी गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले. यामध्ये मंगल कार्यालये व सांस्कृतिक हॉल या ठिकाणी सर्वात जास्त गर्दी राहते. अशा ठिकाणी मर्यादा ओलंडणा-या व नियमांची अंमलबजावणी न करण्यांवर कारवाई करा असे आदेश दिले.
उद्योग व शिक्षण बंद पडता कामा नये :-
कोरोनाबाबत आवश्यक ती काळजी घेवून उदयोग,कारखाने व शिक्षण प्रक्रिया सुरू ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येकाला दैनंदिन जीवन जगण्यासाठी पैशाची गरज असते. हाताला काम असेल तर रोजी रोटी चालते. तसेच शिक्षणातून उद्याची पिढी घडत आहे. या दोन्ही बाबी अत्यंत गरजेच्या असून त्यामध्ये खंड पडू देवू नये असे वाटते. त्यामूळे संसर्ग रोखण्यासाठी सर्व उपाय योजना राबवून त्या सुरू ठेवण्याबाबत मंत्र्यांनी या बैठकीत सूचना केल्या.
तेलंगणामधे गेलेल्या कामगारांनी लॉकडाऊनची काळजी करू नये :-
गडचिरोली व चंद्रपूर जिल्हयामधील कित्येक मजूर कामानिमित्त शेजारील तेलंगणामध्ये गेले आहेत. त्यांना आता लॉकडाऊनची भिती वाटत आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारे भिती बाळगू नये असे आवाहन मंत्री यांनी यावेळी केले. राज्यात लॉकडाऊन लागणार नाही म्हणून कोणीही कोरोनाची काळजी करणे सोडू नये. सर्व कामगारांनी आपली काळजी घ्या. तसेच बाहेर गेल्यानंतर व आल्यानंतर तपासण्या करा. आपल्यामूळे इतरांना त्रास होणार नाही याची पण काळजी घ्या असे यावेळी त्यांनी कामगारांना आवाहन केले.
फायर ऑडीट नंतरच्या कराव्या लागणाऱ्या उपाय योजनांसाठी एसडीआरएफ मधून निधी :-
विदर्भातील पाचही जिल्हयांना आरोग्य विषयक इमारतींच्या फायर ऑडीटनंतर लागणाऱ्या उपाय योजनांसाठीचा निधी प्राधान्याने एसडीआरएफ मधून देवू असे आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिले.ऑडिट झाल्यानंतर प्रत्येक रूग्णालयात आवश्यक आग रोधक यंत्रणा उभारणे गरजेचे असून याबाबत नियोजन करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिल्या.
निखील राखडे (गडचिरोली जिल्हा मुख्य प्रतिनिधी)
9405228787