स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी बांधलेला 153 वर्षांपूर्वीचा नायगाव आणि भाईंदर खाडीवरील जुना रेल्वे पूल तोडण्यास मंगळवार (ता.17) पासून सुरुवात झाली आहे. जवळपास चार पिढ्यांशी या पुलाचे भावनिक नाते अखेर संपुष्टात येणार आहे.
ज्या काळी दळणवळणाची काही सोय नव्हती. त्या काळी ब्रिटिशांनी नायगाव आणि भाईंदर खाडीवर हा पूल बांधला होता. या पूलवरून 12 एप्रिल 1867 साली पहिली रेल्वे विरार ते बॉम्बे बैकबे या दरम्यान धावली होती. त्यावेळी विरार ते बॉम्बे बैकबे यादरम्यानच्या स्थानकांची नावे ही मज्जेशीर होती. यामध्ये नाला, बेसिन, पंजे, बोरवला, पहादी, अंडारू, सांताक्रुज, बंडोरा, माहीम, दादुर, ग्रांट रोड आणि बॉम्बे बैकबे या स्थानकांचा समावेश होता. त्यानंतर या स्थानकाची नावे बदलण्यात आली. यामध्ये नालासोपारा, वसई रोड, भाईंदर, बोरिवली, मालाड, अंधेरी, बांद्रा, दादर या स्थानकांचा समावेश झाला. साधारणपणे 1989 च्या दरम्यान येथे दुसरा पूल नव्याने बांधण्यात आल्याने हा पूल विस्मृतीत गेला होता. 1990 पासून एकाकी उभा असलेला पूल अखेरची घटका मोजत उभा होता; परंतु अखेर हा पूल तोडण्यास सुरुवात झाली आहे. नायगाव आणि पाणजू दरम्यानच्या पुलाचा लिलाव झाल्याने ठेकेदाराने हा पूल तोडण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला पुलाच्या पिलरला हात न लावता पुलाच्या वरचे गॅस कटरच्या साह्याने तोडण्यास सुरुवात झाली आहे; तर भाईंदरकडच्या पुलाचा लिलाव बाकी असून तो झाल्यानंतर तो पूलही तोडण्यात येणार आहे. असे म्हणतात की, या दोन्ही पुलाच्या पिलरमध्ये प्रमाणात शिसे आणि तांबे ओतण्यात आले होते. त्याची किंमत आज करोडो रुपयांची आहे. या पुलाचा सर्वात जास्त उपयोग हा पाणजूच्या लोकांना जा-ये करण्यासाठी होत होता.