लातूर:
रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृतीत महत्वाचा भावनिक सण आहे. दरवर्षी रक्षाबंधनासाठीच्या राखी टपाल हाताळण्यासाठी टपाल विभाग विशेष काळजी घेतो. यावर्षीदेखील राखी टपाल महाराष्ट्रातील टपाल कार्यालयाद्वारे मोठ्याप्रमाणात पाठवले जातील, अशी अपेक्षा टपाल विभागातर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
यासाठी राखी टपाल बुकिंग, प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था लातूर जिल्ह्यातील पोस्ट कार्यालयातून करण्यात आली असून, याचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूरच्या डाक कार्यालयाचे अधिक्षक बी. रवि कुमार यांनी केले आहे.
यावर्षी हा सण अधिक महत्वाचा आहे, कारण एकाच शहरात राहणाऱ्या भावंडांना कोरोनाच्या विविध निर्बंधांमुळे या सणासाठी भेट घेणे शक्य होणार नाही. कदाचित त्यांचे भाऊ -बहिणी कंटेनमेंट झोन किंवा सीलबंद इमारतींमध्ये रहात असतील.
रक्षाबंधन सण ३ ऑगस्ट रोजी असल्यामुळे लातूरसह राज्यात रविवार, २ ऑगस्ट रोजी सर्व वितरण पोस्ट कार्यालयांमध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था केली आहे. सर्वांनी वेळेत राखी पोचण्यासाठी स्पीड पोस्ट सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधिक्षक बी. रवि कुमार यांनी केले आहे.