सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. पै. चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ आदरणीय श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली येथे भव्य सभेस संबोधित केले. भाजपाचा जर पराभव करायचा असेल, तर डबल महाराष्ट्र केसरी विजेत्या चंद्रहार पाटील यांच्या मागे आपल्याला खंबीरपणे उभे राहायचे आहे. या मतदारसंघात काहींची इच्छा आपण पूर्ण करू शकलो नाही. मात्र त्यामुळे लढाईची दिशा बदलणे योग्य नाही.
स्टेजवर एक आणि खाली एक अशी भाषा जर आम्ही करायला लागलो तर पंचायत होईल. लोक काय म्हणतात ते फार महत्त्वाचं नाही. आपली विवेक बुद्धी जागृत ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की, माझ्या पक्षात राहायचं असेल, माझ्याबरोबर काम करायचं असेल तर त्यांनी चंद्रहार पाटलांचा प्रचार केला पाहिजे. त्यांनी इकडे तिकडे दुसरं काही केलं तर त्यांना माझा शेवटचा नमस्कार राहील.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अनेक जागांवर पाणी सोडलं. कारण आघाडी एकसंघ राहिली पाहिजे. मागे अमरावतीत आम्ही अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांना पाठिंबा दिला. त्या निवडून आल्या आल्या भाजपात गेल्या. तेव्हा मला कुठली दुर्बुद्धी झाली होती माहिती नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवारांना निवडून देणे हे अधिक धोकादायक आहे. कधी कुठे जातील काही पत्ता नाही.
उद्धवजींचा स्वभाव असा आहे एकदा त्यांचा निर्णय झाला की, ते ताकदीने त्यासाठी लढतात. सूर्य एक वेळ पश्चिमेला उगवेल मात्र ते निर्णय बदलत नाहीत. त्यामुळेच महाराष्ट्रातला शिवसैनिक त्यांच्या मागे उभा राहतो. गंगेत कोरोनाच्या काळात प्रेतं वाहून गेली. मात्र महाराष्ट्राला या कठीण काळात तारण्याचे कार्य तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केले. शेतकऱ्यांना पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफी दिली.
इतक्या वेळा भाकरी करपली तरी आचारी बदलण्याची एकाचीही हिंमत झाली नाही. तुमच्यावर महागाई लादणारा, बेकारीची कुऱ्हाड रोखणारा, आपल्या आया बहिणींची अब्रू गेली त्यावर चकारही न काढणारा जो मूळ मालक आहे तो बदलण्याची वेळ आली आहे.
यावेळी खासदार संजय राऊत, आमदार विश्वजीत कदम, महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.